येळकोट नामाचा करिता गजर आनंद भक्ताच्या मनी दाटे..
करुनी कुळधर्म कुलाचार अवघ्या सात जन्माचे पाप घटे..
एका म्हणे तोडिता लंगर, कडी एक तुटे नी सहस्त्र विघ्न हटे..
लोकगीतामध्ये कुळधर्म कुलाचार आणि लंगर चे महत्व सांगितले आहे. जागरण गोंधळ झाल्यानंतर लंगर (लोखंडी साखळी) तोडण्याचा विधी होतो. यावेळी साखळीचे एक टोक खिळ्यामध्ये अडकविले जाते तर दुस-या बाजूचे टोक लंगर तोडणा-च्या हातात असते, 'सदानंदाचा येळकोट' च्या गजरात साखळीला हिसका देऊन कडी तोडली जाते. सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडल्यास कडी सहज तुटते आणि एक कडी तुटल्यानंतर हजार विघ्न हटतात इतके महत्व लंगर तोडण्याच्या विधीला आहे अशी भाविकांची श्रद्धा असते.