कुल-कुळधर्म-कुलाचार

आप्त संबंधांमुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात असे एका रक्ताचे व संबंधांचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास कुळ असे म्हणतात.कुळ शब्दाला मराठीत घराणे असा शब्द रूढ आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीत अनेक कुळे असू शकतात.
कुळधर्म ज्ञान कुळधर्म सधन । कुळधर्म निधान हाती चढे ।।१।।
कुळधर्म भक्ती कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ।।२।।
कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनांचे ।।३।।
कुळधर्म महत्व कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकीचे ।।४।।
तुका म्हणे कुळधर्म दावी देवी देव । यथाविध भाव जरी होय ।।५।।
--तुकाराम महाराज.
कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा  सर्वथा न करावा अनाचार --ज्ञानेश्वरी
कुळाचा कुळधर्म आवश्य पाळावा कुठेही अनाचार करू नये,कुळाचे नाव सर्वतोपरी उंचावण्याचे कार्य करावे कुलाच्या नावलौकिकाला कोणताही डाग डाग लागणर नाही याची काळजी घ्यावी समाज विघातक कृत्य करू नये.
कुळधर्माचे उपयुक्तता सांगताना संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात
कुळधर्मु चाळी विधिनिषेध पाळी मग सुखे तुज सरळी दिधली आहे  --ज्ञानेश्वरी
आपला कुलधर्म पाळावा, कुलाचारांचे आचरण करावे तसेच शास्त्रांनी सांगितलेली सत्कर्मे जरूर करावीत व ज्या कर्मांचा निषेध केला आहे ती कर्मे टाळावीत इतके केले म्हणजे सुखाने वागावयास मोकळीक आहे.
वंश परंपरेने आलेले रूढी रिती रिवाज तसेच दैवते यांना कुळधर्मामध्ये अनन्य साधारण महत्व असते.या संदर्भात समर्थ रामदास स्वामीनी ग्रंथराज दासबोध मध्ये सांगितले आहे
याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम  उत्तम अथवा मध्यम करीत जावे  --दासबोध
आपले कुळधर्म आणि कुलाचार जसे परंपरेने चालत आले असतील, तसे सुरु ठेवावेत याशिवाय आपल्या घरी जे कुळधर्म असतील ते जसे चालत आले असतील ते उत्तम किंवा मध्यम असोत आपण ते करीत राहावे.
कुळधर्म म्हणजे समाज व्यवस्थेतील कर्तव्यांचे पालन करण्यासाठी व समाज व्यवस्था टिकण्यासाठी केलेले अलिखित नियम होय. धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य करणे ते पार पाडणे असाही आहे म्हणून आपआपल्या घराण्यातील परंपरेने चालत आलेले धर्मविधी किंवा चालीरीती पार पाडणे म्हणजेच कुलधार्माचे पालन करणे.
हिंदू धर्मीयांमध्ये प्रत्येक कुळाची म्हणजेच घरण्याची काही वैशिष्ठे असतात काही वेगळेपण तर काही साम्य असतात.प्रत्येक घराण्याला स्वतःचे दैवत,स्वतःचे आचार विचार असतात.यामध्ये भौगोलिक रचनेपरत्वे,आर्थिक कुवतीनुसार आदी गोष्टीमुळे बदल घडू शकतात.